Friday, January 20, 2012

सागर


लहरे देखे लोग बोले, कितना प्यारा सागर ..
और किनारे खडे हुए, साथ मे लेके गागर...!!!

सागर पर मन मे दुखी, देख लोगो की आस ..
नमकीनसे इस पानीसे, कैसे बुझाये प्यास ...!!!

गागर रह गयी खाली, और लौट गए लोग ..
वही लहरे वही किनारा.. वही जनम के भोग ...!!!

तबसे मनमे बात लिये सागर है अकेला ..
चांदनी की रात है पर दिल मे नही उजाला ...!!!

जाने कहा से आया जोगी बात यही समझाई
जन्मों के इस बंधनकी लडी नयी सुलझाई ...!!!

क्यों ये अकेलापन, किस कारन ये तनहाई ..
दुखो की गंगा बहते बहते तुम्ही में समायी ...!!!

दुःख कोई बड़ा किसी का.. कही किसीका महीन ..
जगके आसू पीकर सागर हुआ नमकीन ...!!!

ह्रदयपीड की किरणों से दुःख की भाप बने ..
खारेपन का निशान नहीं... बस बादल घने ...!!!

कारे कारे बादल यू जब छु जाये आसमान ..
सौंधी खुशबू गीली बूंदों में भीगे ये जहाँन ...!!!

उसी जमीनपे खडे है लहलहाते ये धान ..
इन्ही मीठे फलोंको पाकर तृप्त जग के प्राण ...!!!

लहराता खुश हुआ सागर मन ही मन मे ..
वो जोगी आन बसा है मेरे इन नैंनोंमे ...!!!

ओ जोगी तेरे एहसान, तू बता तेरा क्या नाता ..
बोला जोगी.. दू:ख बनके मैं तुझमे ही मिल जाता ...!!!

आदिम कालसे तेरी लहरे गाये मेरे गान ..
जुदा कहा मै तुमसे, तुम ही मेरी पहचान ...!!!

तबसे लेके आज तक इन दोनों का है नाता..
जोगीकी आहट पे सागर नैनोसे छलकता ..!!!

- भक्ती आजगावकर

धन्यु अभिषेक  ... :)




Saturday, December 31, 2011

३१ डिसेंबर २०११


असाच अजून एक दिवस उगवेल ...  अगदी असाच मावळेल पण... 
कालसुद्धा असाच उगवला होता ... अन उद्या सुद्धा त्यात काही फरक होईल असे नाही... 
अनादी काळापासून हे असेच होत राहिलेय .. अन जगाच्या सो कॉल्ड अन्तापर्यंत हे असेच राहील... 

मग अट्टाहास कसला हा...सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस.. अन नववर्षाचे स्वागत... 
कित्येक पोस्टस, कित्येक शुभेच्छा, कित्येक SMS या जगाभवती फेऱ्या मारत असतील,
वर्तमानपत्राचे रकाने, अन शुभेच्छापत्रांची दुकाने ओसंडून वाहत असतील ... 
अन कहर म्हणजे बेगड्या मुखवट्यांचे हुकमी हसू घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या कानाला हे शब्द या दिवसभरात स्पर्श करून गेले असतील ... 

मग का अजून एक पोस्ट...  म्हणून सकाळ पासून केलेला कंटाळा... दर वर्षीचे रुटीन म्हणून डायरीवर एक नजर फेकून बंद केलेले शेवटचे पान... 
अन झरकन मनावर एक ओरखडा... रिकाम्या पानाचा... शेवटचे पान... शेवटचा दिवस.. २०११ चा...
शेवटाचा...  समारोपाचा.. गतवर्षाच्या जमाखर्चाचा.. दिवस-रात्रीच्या पलीकडे आयुष्याचा एक कालखंड जो उलटला.. त्याच्या ताळेबंदाचा .. 

अन जेव्हा या विचारासरशी पुन्हा एकदा डायरीची पाने उलटली... त्या क्षणी जाणीव झाली की कृतज्ञता मानावी इतक्या छान गोष्टी या वर्षात पदरी पडल्यात... वर्षाच्या सुरुवातीलाच अनुभवलेले... एक माणूस म्हणून विविध शक्यतांची दारे उघडणारे सेशन ... अन त्याच शक्यतांचा पाठलाग करताना.. स्वता:चा शोध घेत आत आत जाताना... पुन्हा गवसलेले वेडे वेडे व्यसन.. शब्दांनी खेळण्याचे व्यसन... भावनांना जोजावून लाडावून गेयरूप देण्याचे व्यसन ... 

कॉलेजमध्ये असताना ... नंतरच्या काळात नोकरीच्या अधे मध्ये कधी.. कधी आनंदून कधी हिरमुसून...  कधी अंधुक आशेत कधी काळोख्या निराशेत लिहिलेल्या नोंदी जुन्या डायरीमध्ये पाहून, वाचून परत डायरी मिटून ठेवायचे.. अशी किती वर्षे दरम्यान उलटली... बाहेरचा संवाद वाढत गेलेला कामानिमित्त, दैनंदिन जगण्याच्या आमिशात पण आतला संवाद कुठेतरी मनाच्या तळाशी गप्पसा उदास एकटा... 

कित्येक वर्षाने त्या डायरीला एका नवीन रुपात नवीन साजानिशी परत एक गळामिठी दिली ती याच वर्षात.. 
चारोळ्या... कविता.. मुक्तक अश्या विविध रुपात मनातल्या भावना मांडताना आंतरजालावर एक अस्तित्व.. स्वर्णिम सखीचे.. अन या प्रयत्नांना एक आत्मीय सोबत ... तुम्हा सर्वांची ... कौतुक करणारी, कान ओढणारी.. हवीहवीशी वाटणारी.. 

असे हे उमलते सुगंधी स्वत्व सापडणे हे या वर्षाचे किती सुंदर ऋण... या ऋणातून उतराई व्हायचेच नाहीये... पण जाताजाता सरत्या वर्षाला कृतज्ञतेचे एक अर्ध्य नक्कीच... 

उद्या पुन्हा तीच पहाट होईल... तीच सकाळ अन तशीच संध्याकाळ पण होईल... पण या क्षणी थांबून एक धन्यवाद तुम्हासाठी... या आशेसह की येणारे नवे वर्ष सर्वांसाठी उन्नतीचे सौदार्हाचे अन आनंदाचे जावो !!!! 

भक्ती आजगावकर 




Thursday, December 22, 2011

सहेला रे...


ओ SSSS.... सहेला रे... 

मूर्तीवर पळी पळी अभिषेक करणारा हात जरासा थांबला... त्या लाल आवरणात गच्च लपेटलेल्या मनाला एकवार साद घातल्यासारखा तो आवाज.. "सहेला रे".... झटक्यात जाणीव की अजून आत काहीतरी जिवंत आहे... एका क्षणाचीच ... एका क्षणात कंपन पाऊन परत स्थिर होणाऱ्या तंबोऱ्याच्या तारेगत मन परत दगड... पुन्हा अभिषेकाची धार मूर्तीवर त्याच गतीत सुरु झाली... परत तेच नि:शब्द आवर्तन... पुन्हा तोच अडकलेला श्वास ... पुन्हा तेच अंधारे भवताल ... 
आताश्या हे असे का होतेय.. एका शिळेगत जगणे अंगवळणी पडल्यावर पुन्हा ही जाणीव... जिवंत असल्याची पुन्हा एक आठवण ... का.. कशासाठी... ??
" आ... मिल गाये ... सहेला रे......sss " 


"सप्त सुरन की बेल सजाये ...... "
परकरी वयात नवरोबा म्हणून चिडवून घेताना अस्सा राग आलेला सगळ्यांचाच... कसे नाक उडवत चिडवतात सगळे... अन हा पण का असा मागे मागे करतो.. पण, पंडितराव गुरुजींकडे सा गिरवताना, तिरपा डोळा करून भुवई उंचावून पाहिल्या क्षणी ओंजळभर चिंचेचे आकडे दाखवलेस न, त्या क्षणी कुठे तरी रुजवात होती का या नात्याची ... खेळताना, भांडताना बाजू घेताना .. उघडलेल्या तळव्यावर केवड्याची सुरेख पात ठेवताना .. आरशात बघून कुंकू लावताना उमटलेल्या प्रतिमेतून हसू सांडताना ..


" आ ssss आ ... मिल गाये... जनम जनम का संग ना भूले... "


लाल आलवण मानेभवती घट्ट लपेटून घेत पाऊले आपसूक घाटावरच्या मंदिराकडे वळली...एकेक चिरा ढासळत असलेल्या त्या मंदिराच्या गाभाऱ्यात उदास एकच दिवा जळत होता... तो ही अधुरा, भवातालचा अंधार विझवायला... वाऱ्याच्या झोताबरोबर झगडण्याची त्याची अपुरी धडपड... अन या कशाचाच मनावर न उमटणारा ओरखडा.. 


"सहेला रे ssss .. सहेला रे..." 

मोरपीस फिरवल्यागत एक शहारा अंगभर उमटून गेलेला.... आंब्याच्या आडव्या फांदीवर बांधलेल्या झोक्यावर झोके घेताना... सुरात सूर मिसळून गाताना... पहिल्यांदा हातावर ठेवलेला हात लाजून काढून घेताना... किती क्षण ... किती ताना ... किती झोके.. तुझे माझे.. 
गाणे शिकण्यासाठी तुझा इंदूरला जायचा निर्णय... अन वेड्यागत वाडाभर भिरभिरून शेवटी माजघराच्या उंबरठ्यावर अडखळलेले पाऊल... किती आणिक काय बोलू असे झाले असताना तुझे दिलाश्याचे शब्द... "तुझ्यासाठी आहेच मी ..नेहमीच असेन. येईन न परतून लगेच...!!" आभाळभर भरारी घेणाऱ्या गाण्याला गवसणी घालायचे तुझे स्वप्न अन माजघरातून पडवीत, अंगणातल्या मोहरलेल्या तुळशीपासून मागल्या दारच्या बहरणाऱ्या शेवग्यापर्यंत माझे जगणे तुझ्या शब्दाभवती पिंगा घालणारे.. हिरव्या काकणातून अन गर्भरेशमी लुगड्यावरून हळुवार हात फिरवताना लाजून चूर झालेले... 

" जनम जनम का संग ना भूले... अब के मिले तो बिछुर न जाये... "

पुन्हा पुन्हा ही रात्र येते.... दिवसच्या दिवस अख्खा एका आवर्तनासारखा संपतो... तारीख बदलते.. ऋतू बदलतात... अवचित पुन्हा जुन्या आठवणीचे दोन चार शिंतोडे तेवढे मनावर पडून जातात... पण ही रात्र... डोळे रोखून पाहत असल्यासारखी... सावज हेरून दबा धरून बसल्यासारखी.. दर दिवसाच्या शेवटी पुन्हा एकदा कोंडीत पकडणारी... अंतहीन ...कोरडीठाक .. माहेरी असताना आजीच्या मऊ लुगड्याची शिवलेली गोधडी पांघरली की साऱ्या आयुष्यावर एक सुरक्षित माया जाणवे... आजकाल सारे आयुष्यच उघड्यावर पडलेय का..?? अन त्याचेही काही सोयरसुतक वाटू नये हे का... ??? 

श्वासाची एक अखंड माळ कळतनकळत चालू राहावी अशी... एखादी उचकी.. एखादी कळ.. एखादीच वेदना..जगण्याशी बांधून ठेवणारी एक तरी खूण.. रंगाच्या गंधांच्या या पसाऱ्यात इतके अलिप्त रंगगंधहीन होऊन जावे जगणे... सुरांच्या अविनाशी सागरातून तुझ्यापर्यंत पोहोचेल अशी एकही धून हाती लागू नये ... ???

"सहेला रे ..." माळेचे मणी ओढत रात्र संपलीय ... पुन्हा एक आवर्तन सुरु... पुन्हा एका चौकटीचा प्रवास सुरु ... दुसऱ्या रात्री पर्यंतचा!!! 

"आ मिल जाये... सहेला रे... "

दीपदानाचा दिवस आठवतोय का ??... घाटावरच्या देवळात साऱ्या गाभाऱ्यात, मंडपात अन घाटावरही.. जिथे तिथे पणत्यांच्या चिमुकल्या वाती अंधारावर राज्य गाजवताना... देवळाच्या आवारातल्या दीपमाळा तेजाळत आकाशाकडे उन्नत पाहताना...अन घाटावर पायऱ्यावर बसून लाटांवर दिवे सोडून देताना...
सोबत होतास न तू... आहेस... अजून आहेस... 
आश्वासक सोबत... 

या लाटा अजून हेलकावताहेत.. त्या पणत्या वाहत दूर किनाऱ्याला लागल्यात का... तुझ्या किनाऱ्याला?? 
थंडगार पाण्याचा स्पर्श पावलाला... आत्म्याला त्या परमात्म्याचा स्पर्श असाच होत असावा का ?? 
"सहेला रे ... अब के मिले तो बिछुर न जाये... !!! "


ही रात्र संपलीय आता ... सहेला रे...सहेला रे... !!! 


- भक्ती आजगावकर 


छायाचित्र आंतरजालाहून साभार!! 

प्रेरणा : गानसरस्वती किशोरी अमोणकर यांची "सहेला रे" ही अप्रतिम कलाकृती 
इथे ऐका...

Monday, November 7, 2011

कवडसे



हे असेच व्हायचे होते का ... 

आपल्याच नकळत श्वासासोबत आपण ही जगत जातो सामोरा आलेला क्षण.. आजूबाजूच्या घटनांना कवेत घेऊन.... धावत कधी .. कधी धडपडत... अन या धडपडीत कधी तरी गवसलेला तू... 

आठवतं का तुला... भांडलोच होतो चक्क आपण..(म्हणजे मी!!).. पहिल्या भेटीत... ते पण एका रिक्षावरून.. वरून कोसळणारा पाऊस अन ऑफिसची महत्वाची मिटिंग .. त्यात एकाच रिक्षामध्ये शिरलेले आपण दोघे.. मी तर पूर्ण आवेशात तुला बाहेर काढायलाच तयार ... "पण ठिकाण एकच न तर एकत्र जाऊ" या तुझ्या बिनतोड उत्तरावर मी गपगार... खरेतर त्या भांडणात जिंकण्यापेक्षा.. त्या क्षणाची गरज म्हणून !!! 

अन त्यानंतर अवचित झालेल्या गाठीभेटी... कधी हो ना करता करता सुरु झालेले कॉफीसत्र ... कधी दिले घेतलेले मोबाईल नंबर्स ...अन फोरवर्डस वाचता वाचता कधीतरी सुरु झालेला संवाद ... अन या सर्वांत तु कधी जगण्याचा एक भाग बनत गेलास हे देखील कळले नाही ... सकाळ तुझ्या गुड मॉर्निंगने झाली नाही तर चुकल्याचुकल्या सारखे व्हावे.. अन दिवसभरात केव्हाही एक हक्काचा श्रोता म्हणून मी तुझ्या आश्रयास यावे... इतके सहज ..इतके सुभग ..सोपे सोपे से होऊन गेले होते .. 

पण हे सारे तुझ्यासाठी एका छान मैत्रीचा भाग होता .. तुझ्या मोकळ्याढाकळ्या स्वभावाचा सहज आविष्कार..!!
 .. 
कधीतरी बोलता बोलता निघालेला तुझ्या लग्नाचा विषय ...अन गोठून गेलेले मी... 
म्हणजे तेव्हाही आपल्यात काय आहे न पुढे काय बदलेल याचा अंदाज नव्हताच म्हणा.. पण तुझ्याशिवाय पुढे काय याचा विचारच येईना..!!
कसलेसे अनोळखी काहूर घेऊन परतलेले मी.. 

स्वत:शीच या सारया गोष्टींचा ताळमेळ मांडायला बसले तर आठवणींचा धबधबाच कोसळला मनभर ... 
कितीतरी जुळलेल्या आवडीनिवडी सहज शेअर केल्यासारख्या... 
गप्पा, गाणी, भटकणे, खाणे.. कविता, गझला, अभंग, दोहे... सूर ताल ठेका लय .. कसले कसलेच वावडे नव्हते... 

उलट श्वासासह निरंतर सुरु असेल असे गाणे जणू जगण्याचाच भाग होते... दिवसाची सुरुवात अन शेवट सुद्धा गाण्यानेच करण्याची कल्पना तुझीच ... त्यावरून दिवसाचा मूड जोखण्याचे कसब असेच मुरत गेलेले तुझ्यात माझ्यात.. अन त्याच शब्दांच्या आश्रयाने त्या त्या दिवसाची मलमपट्टी पण ... आनंदाला आनंदाची दिवेलागण, विजयाला कौतुकाची थाप अन हळव्या दुखऱ्या क्षणाला दूरवरून का होईना पण "मी आहे"चा आधार ... 

कितीतरी अनवट कवितांचा अर्थ असा तुझ्या सोबत बोलता बोलता कळला होता.. 
कितीदा तरी गुलमोहर तुझ्या न माझ्या साक्षीने फुलला होता 
कितीतरी संध्या तुझ्या न माझ्या अश्या सोबतीने भिजल्या होत्या ... 
अन कितीतरी पाऊसरात्री स्वप्नासह रुजल्या होत्या ..

पण.. तरीही तू माझा होतास..? तुला कधीच कळले नाही का रे...? माझे शब्द कधीच बोलले नाहीत तुझ्याशी..?? नजर कधी ओझरते देखील हितगुज सांगून गेली नाही ... ? की हे सारे कवडसेच होते माझ्याच अपेक्षांचे? प्रकाशाची दिशा बदलली कि बदलून जाणारे .. 

तू तर अजून ही तसाच ... तेवढाच ओढाळ...स्नेहाळ... तेवढाच आत्मीय ...

अन मी ..? सलील् सीमेवर उभी ... !!! 


- भक्ती आजगावकर 

Thursday, October 27, 2011

दिवाळी ...


दिवाळी ...
दिपवाळी .. दीपावली ... दिव्यांच्या ओळी  ... 
      प्रकाशाचा उत्सव ..
          ज्योतींचा महोत्सव ... 

किती उजळून निघतो सारा आसमंत .. लक्ष लक्ष दिव्यांची मोहक नक्षी .... 
साध्या मातीची पणती ..पण तिचे इवलेसे मांगल्यमय तेज दूर करते पराकोटीचा अंधार ... 

अश्या अंध:कारातून सळसळत्या चैतन्याने घेतलेली इक तळपती झेप ...
एक झळकती ज्योती शलाका ... एक मंद तेवणारी वात.. 
तिमिर दूर सारून सत्याचा, चांगुलपणाचा उजेड देणारा एक महान मंगलस्त्रोत ... 
चिमुकला पण आशादायी ..

हा आतला अंधार, निराशेचे गडद तिमिर ओलांडून आशेची वात उजळण्यास कारणीभूत होऊ दे ही इच्छा ... 
येणाऱ्या प्रत्येक अमावास्येत पुढच्या पौर्णिमेची आस मनात जागत राहू दे ही सदिच्छा... 
अन ही दिवाळी तुम्हा साऱ्यासाठी खूप खूप खूप आनंद ... सुख समृद्धी ...अन आंतरिक समाधान घेऊन येवो या शुभेच्छासह .... 


उजळली वात, फाकला प्रकाश 
उटण्याचा गंध भारले आकाश .. 
मांगल्य घेउनी आली ही दिवाळी 
जीवनास लाभो सुवर्ण तेजाची झळाळी!!! 

- भक्ती आजगावकर