दिवस सातवा
आधी गणपतीची रूप डोळ्यात रेखून... मग बाकी काम चालू करतो..
सकाळीच पूजा, आरती करून शेजारयाना आग्रहाने घरी बोलावतो...
पुन्हा नवीन फुलांची आरास, रांगोळीची नवीन नक्षी, नैवेद्याचे नवीन पान घेऊन सुखावत राहतो ..
स्वयंपाकघरात मात्र आज लगबग ऋषिपंचमीची... ऋषीच्या स्पेशल भाजीची...
अळूची पाने अन देठ बारीक चिरून , लाल माठाचे खोड व पाने बारीक चिरून, लाल भोपळ्याचे लहान तुकडे, दोडकयाचे तुकडे, मक्याचे दाणे किंवा कोवळ्या कणसाचे मोठे तुकडे. आंबाडी असे सारे जिन्नस आणि नावाला तेल आणि चवीपुरते मीठ घालून चुलीवर शिजवत ठेवले जाते... चुलीच्या मंद आचेवर अन नंतर वैलावर मंद्श्या धगीत भाजी शिजत राहते .. सारे जिन्नस गुण्यागोविंदाने एकजीव होतात.. अंबाडीचा हलका आंबटपणा मुरत जातो भाजीत .. मक्याची कणसे सारा भाजीचा रस पिऊन मऊ शिजून येतात... अशी हि भाजी दुपारी बाप्पाच्या नैवेद्याच्या पानात प्रामुख्याने वाढून घेतो दिवस... गणपतीला नैवेद्य दाखवून झाल्यावर पंगतीत आग्रह करकरून वाढली जाते अन तितकीच चढाओढीने खाल्ली जाते...
दिवस असा ऋषीपंचमीचा आनंद लुटून घेतो भरभरून ..
पण त्याच वेळेस, आज विसर्जनाचा दिवस हा विचार मनात येताना खट्टू सुद्धा होतो...
संध्याकाळी, शिदोरीचे समान बांधून गणपतीकडे देताना हात जडावतो दिवसाचा..
विसर्जनापुर्वीची आरती जराश्या भरल्या गळयानेच म्हणतो हा दिवस ... टाळ-टाळ्या या लयीत येत असल्या तरी दाटून येणारे कढ मात्र आरतीसोबत मनात जिरवत राहतो...
संध्याकाळी, शिदोरीचे समान बांधून गणपतीकडे देताना हात जडावतो दिवसाचा..
विसर्जनापुर्वीची आरती जराश्या भरल्या गळयानेच म्हणतो हा दिवस ... टाळ-टाळ्या या लयीत येत असल्या तरी दाटून येणारे कढ मात्र आरतीसोबत मनात जिरवत राहतो...

"तुझी यथाशक्ती पूजा केलीय ती गोड मानून घे... तुझा शुभाशिर्वाद माझ्या कुटुंबावर राहू दे.." इतकेच मागणे मागून पूजा संपन्न करतो...
उत्तर पूजेचे तांदूळ देवाचरणी ठेवताना... मूर्ती हलकेच हलवताना त्याचे हात कंप पावतात ...
पुढच्या वर्षी परत येणार हे ठाऊक असून देखील या साजिरया मूर्तीत जीव गुंतत राहतो त्याचा...
दाराशी पुन्हा एकदा रांगोळी रेखून, घराकडे तोंड करून बाप्पाला ठेवले जाते... पाय धुवून, हळद कुंकू लाऊन, लांबच्या प्रवासाची शिदोरी हाती देऊन बाप्पाला निरोप दिला जातो अन मग घरची मंडळी बाप्पाला डोक्यावर घेऊन समोरच्या तळ्याचा रस्ता धरतात..
"पायी हळू हळू चाला.. मुखाने मोरया बोला... मोरया बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लौकर या!!" च्या गजरात बाप्पाला मग तळ्याकाठी आणले जाते... रांगेत साऱ्या घराचे गणपती आपापल्या घरी पाहुणचार घेऊन तृप्त होऊन आलेले असतात .. त्यांची पुन्हा एकदा आरती होते... हिरव्या पार्श्वभूमीवर रंगीत गणपतींची ओळ अन त्यांच्या पुढे भावभक्तीत नादावलेली निरांजने हलताना पाहता पाहता अस्पष्ट होतात.. डोळ्यात साठणारया पाण्याने...
एकेक म्हणता म्हणता बाप्पांना तळ्यात निरोप दिला जातो... पाट उचलून काठावर घेऊन जाताना... तळ्यात बाप्पांचे पाय भिजवताना... पुन्हा उचलून पुन्हा एकदा तळ्यात हलकेच सोडताना.. नजर मागोवा घेत राहते...हात आपसूक जोडले जातात अन मनात परत हाच आग्रह बाप्पाला... "पुन्हा या... लौकर या.. आठवण ठेवा ..."
फळांच्या कापलेल्या फोडींचा/ लाह्या साखरदाण्यांचा प्रसाद वाटला जातो.. अन अश्या निरोप समारंभात दिवस उदासून अंधारून यायला लागतो...
घरात पुन्हा येऊन रिकाम्या माटी खाली पाट ठेऊन पुन्हा एक छोटीशी आरती.. बाप्पा त्याच्या मुक्कामी नीट पोहोचावी या कामनेसह...
अन मग उरलेली संध्याकाळ दिवस पुन्हा पाहत बसतो गणपतीसाठीची आरास.. मनात साठवलेले रूप पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आणून, बाप्पाने पाहुणचार नीट करून घेतला ना या समाधानासह दिवस सुखाने मावळतो...
फळांच्या कापलेल्या फोडींचा/ लाह्या साखरदाण्यांचा प्रसाद वाटला जातो.. अन अश्या निरोप समारंभात दिवस उदासून अंधारून यायला लागतो...
घरात पुन्हा येऊन रिकाम्या माटी खाली पाट ठेऊन पुन्हा एक छोटीशी आरती.. बाप्पा त्याच्या मुक्कामी नीट पोहोचावी या कामनेसह...
अन मग उरलेली संध्याकाळ दिवस पुन्हा पाहत बसतो गणपतीसाठीची आरास.. मनात साठवलेले रूप पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आणून, बाप्पाने पाहुणचार नीट करून घेतला ना या समाधानासह दिवस सुखाने मावळतो...

कोकण किनारयाचे..आसपासच्या स्थलदर्शनाचे..
रेडीच्या प्रसिद्ध गणपतीचे..आरवलीच्या वेतोबाचे.. मालवण - तेरेखोलच्या किल्ल्याचे, सागरेश्वराच्या नितळ किनाऱ्याचे, वेंगुर्ला बंदराचे..
मासळी बाजाराचे.. ताज्या फडफडीत माश्यांचे.. कोळणीशी घासाघीसीचे.. आणि तापल्या तव्यावरच्या ताज्या तुकडीचे..
हॉटेल बांबूचे..त्यातल्या खमंग कुरकुरीत बोंबील, कोळंबीचे ... पण त्या बद्दल पुन्हा कधीतरी ...
...
असे हे दिवस... आल्यापासून गणपतीचा जल्लोष होईतो कापरासारखे उडून जातात...
लॅपटॉप, प्रॉजेक्ट्स, डेडलाइन्स, ईमेल्स, मिटींग्स या साऱ्या कल्लोळातून बाहेर, जरा मोकळी हवा.. एक मुक्त श्वास..
आपल्याच माणसांसोबत घालवलेले सुंदर क्षण ... एकमेकांना सावरत सांभाळत जगलेले काही क्षण .. कुटुंबाचे .. मोठ्या कुटुंबाचे ..
काय नेमके भावते ... गणपती उत्सव..देव - देवत्व .. पण इतकी निस्सीम भक्ती उरलीय का आपल्यात अजून ...??
पण वाडवडिलांनी उभे केलेले विश्व, त्यांच्या जगण्याचा महत्वाचा भाग असलेले स्थळ-काळ रितीभाती काही कालावधीसाठी तरी निदान मागे वळून पहाव्यात.. त्याच्या विश्वाचा भाग असलेले काही क्षण त्याच स्वरुपात अनुभवावेत.. त्या निमित्ताने त्यांच्या जगण्याचा एक अंश आपल्या जगण्यात उतरावा ... ह्याच एका सुत्राने सारा कोकणचा चाकरमानी न चुकता दरवर्षी गावी परतत असावा का.... आम्ही पण त्याच एका भावनेची नाळ जोडून पुन्हा मागे वळतोय का... ??? की प्लास्टिक थर्माकोलचा कणभर ही वापर न करता संपूर्णपणे नैसर्गिक रीतीने साजरा केलेला उत्सव, कानठळ्या बसवणाऱ्या डीजे पासून दूर, तमाम गर्दी गोंधळापासून दूर असा शांत माहोलाचा उत्सव म्हणून ..?? एका कुटुंबाचा एक गणपती असावा.. घरे वेगळी झाली तरी या निमित्ताने माणसे अन त्यांची मने जवळ यावीत.. किल्मिष दूर होऊन तिथे समईसारखा नातेसंबंधांचा आणि संस्कारांचा मंद उजेड पडावा म्हणून .. काही असो .. पण या कोकणच्या गणपती उत्सवाची भुरळ पडते मनाला ...
तसेही बुद्धीचा, विद्यांचा, कलेचा अधिपती म्हणूनच पाहतो न आपण गणपतीकडे... त्यानेच ही बुद्धी दिली असावी !!
शतकानुशतके ती झिरपत राहिली असावी कोकणच्या मातीत... चाकरमान्याच्या रक्तात ..
म्हणूनच देहाचा कण कण गजर करतो ... गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लौकर या !!!!
एव्हाना या साऱ्या अनुभव विस्तारात, देवीचे आगमन ही झालेय... दिव्यत्वाचा शक्तीचा जागर सुरु झालाय..
तेव्हा ह्या आदिमायेच्या जागराच्या कामना ...
" या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता..नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:"
अन या कामनेसह ..
इति कोकणस्य दिवस पुराणं संपूर्णम .. !!! :)
- भक्ती आजगांवकर
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग १
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग २
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ३
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ४
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ५
दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग ६